Wednesday, October 26, 2011

'फॉर्म्युला वन'ची बाराखडी




बघता बघता पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ३० ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉयडा येथे तयार करण्यात आलेल्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर भारतातील ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत पार पडणार असून यानिमित्ताने प्रथमच भारतात या महागड्या खेळाचे आगमन होणार आहे.

गेल्या काही वर्षांपर्यंत खरंतच भारताचा या खेळाशी दुरान्वयेही संबंध नव्हता. मात्र टी.व्ही.च्या माध्यमातून कधीतरी रविवारी सकाळी स्पोर्ट्स चॅनेलवर तब्बल ३०० किमी प्रति तास या वेगाने पळणाऱया या गाड्या पाहून अनेकांचे कुतूहल चाळवले जायचे. त्यात या काळात मायकल शूमाकररुपी हिरो या खेळाला सापडला आणि असंख्य भारतीय तरूणांनीही त्याला डोक्यावर घेतले. परंतु तोपर्यंत या खेळात भारताचे असे काहीच स्थान नव्हते. त्याची सुरूवात झाली ती नरेन कार्तिकेयन या भारतीय ड्रायव्हरने जेव्हा फॉर्म्युला वनच्या शर्यतीत भार घेतला तेव्हा. मात्र कार्तिकेयनला यात फारशी चमक दाखवता आली नाही आणि त्याने एफ वन शर्यतीत ड्रायविंग करायचे थांबवले.

त्यानंतर २००७ सालच्या एका घटनेने मात्र भारतीयांना कायमचे या खेळाशी जोडून टाकले. भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांनी तब्बल ९० मिलियन युरो मोजून फॉर्म्युला वनमधील स्पायकर हा संघ विकत घेतला आणि नंतर त्याचे फोर्स इंडिया असे अस्सल भारतीय नामकरणही केले. मात्र आपण एक गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे की, खरंतर फॉर्म्युला वनमधील संघ किंवा ड्रायव्हर्स हे कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसतात. हा पूर्णपणे खासगी स्वरूपाचा खेळ आपल्याला म्हणता येईल. बड्याबड्या उद्योगपतींचे त्यांच्या कंपनीच्या नावाने ओळखले जाणारे संघ आणि त्यात असणारे देशविदेशातील नानाविध खेळाडू असे साधारण या खेळाचे स्वरूप असते. त्यात कोणीही कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नसते.

२००७ मधील विजय मल्ल्यांच्या या सीमोल्लंघनामुळे भारतीयांना फॉर्म्युला वन हा खेळ जरा जास्तच आपलासा वाटू लागला. आणि याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी मल्ल्यांच्याच पुढाकाराने यंदा पहिलीवहिली इंडियन ग्रां.पी. अर्थात एफ वनची शर्यत भारतात आयोजित करण्याचे ठरवले गेले.

एफ वनची बऱयापैकी माहिती झाली असली, तरी नेमका हा खेळ कसा खेळला जातो, त्यात कोण विजयी ठरतं, काय नियम असतात असे बरेच प्रश्न भारतीयांना सध्या पडले आहेत. त्यामुळे फॉर्म्युला वन हा खेळ समजावून घेण्यापूर्वी त्यातील काही विशिष्ट संज्ञांची ओळख असणे फार महत्त्वाचे ठरते. आज त्यापैकी काही महत्त्वपूर्ण संज्ञा पाहूयात.

ग्रॅड प्रिक्स किंवा ग्रां. पी. – फॉर्म्युला वन किंवा एफ वनमध्ये ग्रां. पी. हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानी पडतो. हे ग्रां.पी. म्हाणजे दुसरे तिसरे काही नसून शर्यत असा त्याचा सरळसाधा अर्थ आपण घेऊ शकतो. उदा. इंडियन ग्रां.पी. प्रत्येक वर्षी किती ग्रां. पी. भरवायच्या आणि त्या कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक वर्षाच्या सुरूवातीलाच तयार केले जाते. जगाच्या विविध कोपऱ्यात या शर्यती भरवल्या जातात. दरवर्षी या शर्यंतींचा आकडा १-२ ने बदलत असतो. यंदाच्या मोसमात (२०११) एकूण १९ शर्यती पार पडणार आहेत. ३० तारखेला नॉयडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर पार पडणारी शर्यत या हंगामातील १७ वी ग्रां.पी. आहे. यावर्षी २७ मार्चला झालेल्या मेलबर्न ग्रां.पी.ने मासमाची सुरूवात झालेली, तर २९ नोव्हेंबरला ब्राझीलमधील साओ पालो ग्रांपीने या मोसमाचा शेवट होणार आहे.

सर्किट – सर्किट म्हणजेच एफ वन शर्यतींसाठी बांधण्यात आलेला खास रस्ता. फॉर्म्युला वनच्या कार्स या प्रचंड वेगाने पळत असल्याने साध्या नेहमीच्या रस्त्यांवर त्या पळणे शक्य नसते. त्यासाठी खास वेगळ्या प्रकारचे रस्ते बांधावे लागतात. भारतातील शर्यतीसाठी बांधण्यात आलेल्या या सर्किटचे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट असे नामकरण करण्यात आलेले आहे. तब्बल ८७५ एकर इतक्या परिसरात हे सर्किट असून त्याची लांबी साधारण ५.१४ किमी इतकी आहे. साधारण दीड लाख लोक या शर्यतीचा याचि देही याचि डोळा आनंद घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रॅक किंवा सर्किटवर एकूण १६ वळणे आहेत, जिथे ड्रायव्हर्सची खरी कसोटी लागणार आहे. सरळ रस्त्यावर तब्बल ३२० किमी प्रति तास इतका वेगही ड्रायव्हर्स गाठू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर वळणांवर मात्र साधारण २१० किमी प्रति तास इतका वेग असेल.

लॅप - एफ वनची एखादी शर्यत पूर्ण करण्यासाठी किंवा ती जिंकण्यासाठी ड्रायव्हर्सना या सर्किटला ठरवलेल्या संख्येएवढ्या फेऱ्या माराव्या लागतात. म्हणजेच या सर्किटचे हे साधारण ५.१४ किमीचे अंतर पुन्हा पुन्हा कापावे लागते. या सर्किटची एक फेरी म्हणजेच लॅप. प्रत्येक शर्यतीत त्या सर्किटच्या लांबीचा विचार करून लॅपची संख्या ठरवण्यात येते. ती साधारण ६० ते ८० च्या दरम्यान असते. इंडियन ग्रां.पी. मध्ये ६० लॅप्स असणार आहेत. म्हणजे एका कारला या सर्किटला ६० फेऱ्या मारायच्या आहेत.

ड्रायव्हर्स आणि कंस्ट्रक्टर्स – एफ वनच्या भाषेत एखादा संघ म्हणजेच कंस्ट्रक्टर. जगभरातील विविध कंपन्या या एफ वनमधील संघांच्या मालक आहेत. यंदाच्या मोसमात एकूण १२ संघ आहेत. फेरारी, रेडबुल, मॅक्लेरन, मर्सिडीज, विलियम आणि अर्थात विजय मल्ल्यांची फोर्स इंडिया ही त्यापैकी काही नावं आपण ऐकली असतील. याप्रमाणेच एचआरटी, टोरो रोसो, वर्जिन, सौबर, टीम लोटस हे इतर संघ किंवा कंस्ट्रक्टर आहेत.

प्रत्येक संघाचे किंवा कंस्ट्रक्टरचे दोन ड्रायव्हर्स शर्यतीत उतरतात. म्हणजे यंदा १२ संघांचे २४ ड्रायव्हर्स हे या शर्यतींमध्ये स्पर्धक म्हणून भिडतायत. मायकल शूमाकल, जेन्सन बटन, सेबेस्टियल वेटेल, फर्नांडो अलोन्सो, मार्क वेबर, लुईस हॅमिल्टन हे सध्याचे काही आघाडीचे ड्रायव्हर्स म्हणता येतील. विजय मल्ल्यांच्या फोर्स वन संघातर्फे अड्रियन सुटिल आणि पॉल दि रेस्ता हे दोन ड्रायव्हर्स आपल्याला इंडियन ग्रां.पी. मध्ये भाग घेताना दिसतील.

गुण – प्रत्येक शर्यतीत विजयी होणाऱ्या म्हणजेच सर्वात कमी वेळात त्या सर्किटचे ठरवण्यात आलेले लॅप्स पूर्ण करणाऱ्या ड्रायव्हरला विजयी घोषित करण्यात येते. आणि त्यानंतर इतर ड्रायव्हर्सचेही त्यांच्या वेळेनुसार पुढील क्रमांक लावले जातात. प्रत्येक शर्यतीनंतर त्या शर्यतीतील त्यांच्या क्रमांकानुसार ड्रायव्हर्सना काही गुण दिले जातात. त्यानुसार प्रथम येणाऱ्यास २५ गुण, दुसऱ्या क्रमांकाच्या ड्रायव्हरला १८, तिसऱ्याला १५, चौथ्याला १२, पाचव्याला १०, सहाव्याला ८, सातव्याला ६, आठव्याला ४, नवव्याला २ आणि दहाव्या क्रमांकावारील स्पर्धकाला १ गुण दिला जातो. वर्षाअखेरीस मोसमातील सर्व शर्यतीत मिळून सर्वात जास्त गुण पटकावणारा ड्रायव्हर त्या मोसमातील चॅम्पियन ठरतो. तर त्याप्रमाणेच आपल्या दोन्ही ड्रायव्हर्सचे गुण मिळून ज्या संघाचे सर्वाधिक गुण होतात, त्या संघाला कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिप दिली जाते.

मोसमातील ३ शर्यती बाकी असल्या तरी यापूर्वीच आपल्या इतर प्रतिस्पर्ध्याच्या खूप पुढे निघून गेल्याने रेड बुलच्या सेबेस्टियन वेटेलने यंदा जेतेपदावर कब्जा केला आहे. त्याचे आता ३४९ गुण झाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील मॅक्लेरेनच्या जेन्सन बटनचे २२२ गुण आहेत. फेरारीचा फर्नांडो अलोन्सो हा २१२ गुणांसहित सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रेड बुलने मॅक्लेरेनला मागे टाकत ५५८ गुणांसहित कंस्ट्रक्टर चॅम्पियनशिपवर दावा सांगितला आहे.

Wednesday, August 31, 2011

जरा हटके जरा बचके !!!



सर्वसाधारणपणे क्रिकेटच्या पुस्तकातील फलंदाज बाद होण्याचे त्रिफळाचीत, झेलबाद, धावचीत, पायचीत, यष्टिचीत हे नियम आपणा सर्वांना ठाऊक असतात. पण क्रिकेटसारख्या रंजक खेळात नेहमीपेक्षा हटके काही घडलं नाही तर मग त्यात नावीन्य ते काय...


या नेहमीच्या पद्धतींखेरीजही क्रिकेटजगतात अत्यंत विचित्र पद्धतीने फलंदाज बाद झाले आहेत.

यातील काही प्रसंग लक्षात घेऊन यासाठी आधीच काही नियम आस्तित्वात होते, तर काही घटना मात्र क्रिकेटबुकलाही नवीन होत्या... नेहमीपेक्षा हटक्या पद्धतीने फलंदाज बाद झालेल्या अशाच काही विचित्र विकेट्सचा हा आढावा...

हॅन्डल्ड  बॉल

२००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौ-यातील कर्णधार स्टीव वॉची विकेट अनेकांना स्मरणात असेल. चेन्नई टेस्टमध्ये हरभजन सिंग वॉला गोलंदाजी करत असताना एक वेगळाच किस्सा मैदानावर घडला होता. टेस्टच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी सुरू होती आणि ३४० या धावसंख्येवर त्यांचे फक्त ३ गडी बाद झाले होते.

यावेळी वॉने हरभजन सिंगच्या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला आणि चेंडू जाऊन सरळ त्याच्या पॅडवर आदळला. हरभजनसकट यष्टीरक्षक आणि स्टम्प्सजवळील सर्वच क्षेत्ररक्षकांनी पायचीतचे जोरदार अपील केले. मात्र पंचांनी लागलीच ते फेटाळून लावले.

परंतु याच वेळी स्लीपमध्ये उभ्या असलेल्या द्रविडची नजर मात्र चेंडूवरच होती. वॉच्या पॅड्सवर चेंडू आदळळ्यानंतर तो तसाच टप्पा खाऊन स्टम्प्सवर जाण्याच्या बेतात होता. घाईगडबडीत तो चेंडू स्टंम्पसवर जाऊ नये म्हणून वॉने तो आपल्या हातानेच अडवला आणि नेमकं हेच द्रविडच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही आणि तत्काळ त्याने पंचांकडे 'हॅन्डलिंग द बॉल'चं अपील केले. पंचांनीही लगेच आपलं बोट उंचावत वॉ बाद असल्याचा निर्णय दिला.

क्रिकटेच्या नियमांनुसार बॅट हातात नसताना फलंदाजाने हलता चेंडू आपल्या हाताने अडवल्यास (काही अपवादात्मक प्रसंग सोडून) त्याला 'हॅन्डल्ड द बॉल' या नियमाअंतर्गत बाद ठरविण्यात येते. स्टीव वॉ याच नियमानुसार बाद ठरविण्यात आला होता.

मात्र अशा रितीने बाद होणारा स्टीव वॉ हा काही एकमेव फलंदाज नाही. वॉच्या आधीही द. आफ्रिकेचा रसेल एनडीन, ऑस्ट्रेलियाचा अॅन्ड्रू हिडीक, पाकिस्तानचा मोशिन खान, वेस्ट इंडिजचा डेस्मंड हेन्स, भारताचा मोहिंदर अमरनाथ, इंग्लंडचा ग्रॅहम गूच आणि द. आफ्रिकेचा डॅरल कलिनन हे सुद्धा काहीशा अशाच पद्धतीने बाद ठरविण्यात आले होते.

स्टीव वॉ नंतर त्याचवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा भारताबरोबरच खेळताना इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉ देखील याच नियमाचा शिकार झाला होता. हा निर्णय मात्र काहीसा विवादास्पद ठरलेला. गंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या अशा एकूण ९ प्रसंगांपैकी चार प्रसंगात भारताचा त्या सामन्यात सहभाग होता. तीन वेळा भारतीय संघ गोलंदाजी करत होता, तर एकात भारताचाच फलंदाज यात बाद झाला आहे.


ऑबस्ट्रक्टींग  फिल्ड 

पुन्हा एकदा याही विचित्र नियमाची ओळख नव्या पिढीतील बहुतेकांना भारताच्याच एका सामन्यादरम्यान झाली. ६ फेब्रुवारी २००६ रोजी पेशावरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हक या दुर्मिळ पद्धतीने बाद झाला होता. मालिकेतील या अत्यंत महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या झालेल्या पहिल्याच सामन्यात अगदी मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला हा नियम चांगलाच महागात पडला.

भारताच्या ३२९ या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्ताननेही चोख प्रत्त्युत्तर देत ५ गडी बाद २८९ अशी मजल मारली होती. ५ विकेट्स शिल्लक असताना त्यांना ४१ चेंडूंमध्ये फक्त ४० धावा हव्या होत्या. फलंदाजीला होता कर्णधार इंझमाम (बटाट्या)...

लक्ष्य आवाक्यात आले आहे असे वाटत असतानाच इंझमामने स्वत:च्या हाताने (की बॅटने (!) आपलाच घात करून घेतला. श्रीसंथचा एक सरळ चेंडू हलकाच मिडऑफच्या दिशेने तटवल्यानंतर इंझमाम दोन-तीन पावलंच पुढे सरकला होता. मिडऑफला उभ्या असणाऱ्या सुरेश रैनाने हे पाहिले आणि सहजच चेंडू यष्टिंच्या दिशेने फेकला.

चेंडू झपकन आपल्या दिशने येत असल्याचे लक्षात येताच क्रीझच्या बाहेर असलेल्या इंझमामने तसाच उलट्या पावली मागे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू नेमका अचूकरित्या यष्टींच्या दिशेने जात असल्याने इंझमाम चेंडूच्या मार्गात आला. त्याने स्वत:ला चेंडू लागू नये म्हणून बॅट मध्ये घातली. मात्र यावेळी इंझमाम क्रीझच्या बाहेरच होता आणि तो सरळ स्टंम्पसवर जाणाऱ्या थ्रोच्या मध्ये आला होता. त्यामुळे भारतीय क्षेत्ररक्षकांनी यावर आक्षेप घेताच पंच सायमन टॉफेल यांनी त्याला ऑबस्ट्रक्टींग द फिल्ड अंतर्गत बाद ठरवले. पाकिस्तानी संघासाठी हा एक मोठा धक्का होता आणि यानंतर त्यांनी हातातोंडाशी आलेला सामनाही गमावला.

इंझमामच्या आधीही तीन फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद झाले होते. त्यापैकी हॅन्डल्ड द बॉल पाठोपाठ येथेही भारतातर्फे नंबर लावला होता मोहिंदर अमरनाथने. श्रीलंकेविरूद्धच्या अहमदाबाद येथील सामन्यात धावचीत होण्यापासून वाचण्यासाठी अमरनाथने चेंडूलाच लाथ मारली होती. लेन हटन आणि रमीझ राजा सुद्धा एकदा याचप्रकारे बाद झाले होते.


टाइम आउट-

टेस्ट आणि वनडेपेक्षा २०-२० मध्ये अनेक नव्या आणि निराळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यातलीच एक म्हणजे सामना चालू असताना फलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू ड्रेसिंग रूमऐवजी चक्क बाऊंन्ड्रीलाइनवरील डगमध्ये बसू लागले आणि प्रेक्षकांना तारे जमीं परचा आभास होऊ लागला. यावेळी २०-२० चे ग्लॅमरस रूप लक्षात घेऊन खेळाडूंना सतत प्रेक्षकांच्या नजरेसमोर ठेवण्याच्या उद्देशाने आयसीसीने हे आदेश दिले की काय अशी शंका अनेकांना आली होती.

मात्र यामागे असलेतसले कोणतेही तद्दन कारण नसून क्रिकेटमधील एका विशिष्ट नियमामुळे सर्व संघांना असे करणे भाग पडले होते. क्रिकेटमध्ये सहसा कधीही उल्लेख न केला जाणारा फलंदाजाला बाद ठरवण्याचा अजून एक नियम म्हणजे टाइम आऊट’.. एखादी विकेट पडल्यावर पुढच्या फलंदाजाने किती वेळात खेळपट्टीवर हजर व्हायचे यासंबंधी मर्यादा घालून वेळेची शिस्त लावणारा नियम म्हणून याचा उल्लेख करावा लागेल.

याअंतर्गत वनडे आणि कसोटी सामन्यात एक गडी बाद झाल्यावर ३ मिनिटांच्या आत पुढच्या फलंदाजाला खेळपट्टीवर हजर व्हायचे असते. तर २०-२० मध्ये हीच वेळ कमी करून अवघे ९० सेंकद इतकी करण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणजे आपल्याला बाऊन्ड्रीलाइनवरील डगमध्ये पॅड, ग्लोव्स इत्यादीसह कोणत्याही क्षणी फलंदाजीसाठी तयार असलेले खेळाडू दिसू लागले आहेत.

कसोटी तसेच वनडेमध्ये ठराविक वेळेत फलंदाज खेळपट्टीवर न पोहोचल्यास निव्वळ विरोधी संघाच्या अपीलवरून एका फलंदाजाला बाद ठरवले जाऊ शकते. तर २०-२० मध्ये मात्र इथेही थोडासा बदल करून गोलंदाजाला रिकाम्या खेळपट्टीवर (फलंदाजाशिवाय) गोलंदाजी करण्याची संधी देत त्याने त्रिफळा उडवल्यास विकेट बहाल करण्याचा नियम करण्यात आला आहे.

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अशाप्रकारे फलंदाजाला बाद देण्याचे काही मोजके प्रसंग घडले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनतरी असा किस्सा घडला नाहीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अशा चार प्रसंगापैकी भारतातील त्रिपुरा वि. ओरिसाच्या एका सामन्यात हेमूलाल यादव या नियमाचा बळी ठरला होता.

हिट  बॉल ट्वाइस-

२००१ चा लगान आठवतोय ??? त्यातला आमीरचा सहकारी गुरा अजही अनेकांच्या स्मरणात असेल. जंगलातून आलेला प्राणी अशी संभावना झाल्यावर चवताळलेल्या गुराने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला होता.. हा गुरा लोकांच्या खास लक्षात राहिला तो त्याच्या आगळ्यावेगळ्या बॅटिंग स्टाइलमुळे...

ब्रिटिश गोलंदाजाचा वेगवान चेंडू एकदा जागच्याजागी बॅटने अडवून त्याला थोडीशी उंची द्यायची आणि मग पुन्हा एकदा त्याला जोरदार हाणायचा... ही या गुराची अनोखी शक्कल.. मात्र लगेचच ब्रिटिश कप्तानाने आक्षेप घेतल्यावर त्याला तसे खेळण्यापासून रोखण्यात आले.. याचे कारण म्हणजे क्रिकेटमधील हिट द बॉल ट्वाइसचा नियम..

स्वाभाविकपणे क्रिकेटमध्ये गोलंजादाच्या हातून चेंडू सुटल्यावर फलंदाजाला एकदाच बॅटने त्याला टोलवायची मुभा देण्यात आली आहे. आणि जाणीवपूर्वक फलंदाजाने दोनदा चेंडू फटकावल्यास त्याला या नियमाप्रमाणे बाद ठरवण्यात येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याप्रकारे अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये.



(क्रिकेट संबंधित माझे तसेच इतरही ब्लॉगर्स व नामांकित लेखकांचे लेख, क्रिकेटसंबंधित सर्व बातम्या व लाइव्ह अपडेट्स आपण cricketcountry.com/marathi या नव्या क्रिकेट संकेतस्थळावर  पाहू शकता.)


Tuesday, April 26, 2011

एका चेंडूत सात धावा.. त्या सुद्धा चौकार, षटकाराशिवाय !!!




क्रिकेटमध्ये एका चेंडूवर जास्तीतजास्त किती धावा करता येतील असं तुम्हाला वाटतं ? अगदी सरळसाधा चेंडू धरला तर फोरच्या स्वरूपाच चार आणि सिक्स मारला तर ६.. बरोबर?  त्यातल्यात्यात जर नो बॉल पडला आणि मग त्यावर षटकार मारल्यास संघाच्या खात्यात ७ धावा जमा होऊ शकतात. पण नो बॉल शिवायही एकाच चेंडूवर सात धावा काढल्या असं कोणी तुम्हाला सांगितला तर? आणि इतकंच नाही तर या चेंडूवर फलंदाजाने चौकार किंवा षटकारही मारला नव्हता. विश्वास नाही बसत ना? मग हा व्हिडीयो नक्की पाहा...

२००६ च्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी (का इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी?) ही अशक्यप्राय मानली जाणारी गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवली होती. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना फ्लिंटॉफच्या गोलंदाजीवर मायकल क्लार्कने  लेगसाइडला चेंडू मारला. इंग्लंडचा क्षेत्ररक्षक होगार्ड चेंडूचा पाठलाग करत होता. त्याने सीमारेषेजवळ चेंडू अडवला आणि स्टम्प्स खूप लांब असल्याने लॉंगऑनवरून वाटेतल्या मिडऑनवर उभ्या असलेल्या पीटरसनकडे थ्रो केला. तोपर्यंत फलंदाजांनी पळून तीन धावा काढल्या होत्या. त्यानंतर पीटरसनने यष्टीरक्षकाकडे थ्रो केलेला चेंडू त्याला अडवता आला नाही आणि ओवर थ्रो होऊन चेंडू सरळ सीमारेषेपार गेला!!!  आणि अशाप्रकारे एका चेंडूवर सिक्स, फोर, नो बॉल शिवाय सात धावा निघाल्या!