हो, ... तर भारत बाद फेरीतच या हाय वोल्टेज विश्वचषकाबाहेर होऊ शकतो. ९ मार्चला नेदरलॅंडविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर अनेकांची अशी समजूत झाली होती की, आता भारत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला सुद्धा.. काही वर्तमानपत्रांनीही या आशयाची बातमी छापली होती. मात्र त्यानंतर आणखी एक-दोन धक्कादायक निकाल लागल्यानंतर आणि आज इंग्लंडने वेस्ट इंडिजला नमवल्यानंतर सगळ्यांनाच खाडकन् जाग आली असेल.
आजच्या निकालामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान अधांतरीच असून त्यांना बाद फेरीतच विश्वचषकातून एक्झिट घेण्याची नामुष्की पत्करावी लागू शकते. अर्थात असं होण्याची शक्यता सध्या खूप खूप कमी आहे. मात्र या विश्वचषकातील आतापर्यंतचे धक्कादायक निकाल पाहता ही शक्यता पूर्णपणे नाकारताही येत नाही.

भारताचा समावेश असलेल्या ब गटात भारतासह द. आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, आयर्लंड आणि नेदरलॅंड अशा सात संघाचां समावेश करण्यात आलेला आहे. आणि यातील अव्वल चार संघ हे उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
सुरूवातीपासूनच ग्रुप ऑफ डेथ मानल्या गेलेल्या या गटात आजच्या इंग्लंडच्या विंडिजवरील रोमहर्षक विजयाने पुन्हा एकदा सगळी समीकरण बदलून ठेवली आहेत. आज इंग्लंडला विंडिजने मात दिली असती, तर इंग्लंड या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असता आणि भारत, आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश हे चार संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी ठरले असते. मात्र आजच्या या विजयाने इंग्लंडने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले असून भारत, बांग्लादेशच्या आणि वेस्ट इंडिजच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. आयर्लंड आणि नेदरलॅंडचे संघ हे यापूर्वीच स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत.
सध्याची स्थिती- सध्या या गटात द. आफ्रिका ८ गुण पटकावून अव्वल स्थानावर आहे आणि त्यांनी याआधीच उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा पक्की केली आहे. त्यानंतर मात्र उरलेलेल्या तीन जागांसाठी वेस्ट इंडिज, भारत, इंग्लंड आणि बांग्लादेश या चार संघांत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
आजच्या सामन्यानंतर इंग्लडचे साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सहा सामने संपले असून त्यातून त्यांचे ७ गुण झाले आहेत. तर या रेसमध्ये असलेल्या चौघापैंकी भारत आणि विंडीजचे संघ त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यात एकमेकांसमोरच उभे ठाकणार आहेत. यापैकी भारताचे ७ तर विंडीजचे ६ गुण झाले आहेत. उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीत असलेल्या बांग्लादेशच्याही खात्यात ६ गुण जमा असून त्यांचा अखेरचा साखळी सामना द. आफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर या ग्रुपचे संपूर्ण भवितव्य आता शनिवारी होणारा बांग्लादेश वि. द. आफ्रिका आणि रविवारी होणारा भारत वि. वेस्ट इंडिज या अखेरच्या दोन साखळी सामन्यांवर अवलंबून आहे.
प्रत्येक संघासाठी संधी-
बांग्लादेश-

बांग्लादेशचा अखेरचा साखळी सामना शनिवारी बलाढ्य द. आफ्रिकेविरूद्ध आहे. बांग्लादेशचे सध्या ६ गुण झाले असून या सामन्यात त्यांनी विजयाची नोंद केल्यास त्यांचे एकूण आठ गुण होतील आणि ते त्याक्षणी उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र या सामन्यात पराभव पदरी पडल्यास ते सहाच गुणावंर अडकतील व त्यांच्यासाठी शेवटच्या सामन्यात भारताने विंडिजला हरवणे आवश्यक होऊन जाईल. तसे झाल्यास विंडिज आणि बांग्लादेश या दोघांचे ६-६ गुण होतील. मात्र याक्षणी वेस्ट इंडिजचा नेट रनरेट(+1.650) हा बांग्लादेशच्या नेट रन रेट पेक्षा(-०.७६५) खूपच जास्त असल्याने सरस धवगतीच्या जोरावर विंडीजच पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल असं म्हणता येईल. ( सगळं नेट रनरेटवर अवलंबून) थोडक्यात बांग्लादेशला बाद फेरीत प्रवेश मिळवायचा असल्यास द. आफ्रिकेला हरवणे (अर्थात ती काही खायची गोष्ट नाही) हा एकच राजमार्ग उपलब्ध आहे.
वेस्ट इंडिज-

वेस्ट इंडिजचेही आता ६ गुण झाले असून त्यांचा अखेरचा साखळी सामना भारताविरूद्ध आहे. या सामन्यात त्यांनी विजय मिळवल्यास ते ही बिनदिक्कत बाद फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र हार सहन करावी लागल्यास मामला पुन्हा रनरेटवर येईल आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे बांग्लादेशचा आफ्रिकेविरूद्ध पराभव झाल्यास नेट रनरेटवर ते सरस ठरून आगेकूच करू शकतात. त्यामुळे इन शॉर्ट वेस्ट इंडिजसाठी भारताविरूद्ध विजय= थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आणि पराभव पदरी पडल्यास बांग्लादेशही आफ्रिकेविरूद्ध हरलेला असणं गरजेचं. (बांग्लादेशपेक्षा जास्त नेट रन रेट कायम असावा)
भारत-
इंग्लंडबरोबरच्या टाय सामन्याच्या कृपेने सात गुण बाळगून असलेला भारत अखेरच्या साखळी सामन्यात विंडिजला टक्कर देईल. सामना जिंकल्यास बाद फेरीची दारं आपसूक उघडतील. मात्र हा सामना गमावूनही भारताला सरस धावगतीच्या जोगावर पुढे वाटचाल करण्याची सर्वात जास्त संधी आहे. मात्र अगदीच शक्यता कमी असलेला पर्याय म्हणजे भारताला विंडिजकडून खूप दारूण पराभवाला सामोरं जावं लागणं. असं झाल्यास आणि भारताची धावगती इंग्लंडपेक्षा कमी झाल्यास करोडो भारतीयांची विश्वचषक जिंकण्याची स्वप्न (आणि आयसीसीची पैसा कमावण्याची ;) ) स्वप्नं धुळीला मिळतील. (पण पुन्हा एकदा.. याची शक्यता खूप म्हणजे खूपच कमी आहे)
भारतासाठी आणि एकंदर ग्रुपसाठी शक्यता-
१) भारत विंडीजविरूद्ध विजयी, बांग्लादेश आफ्रिकेविरूद्ध विजयी-
भराताचे नऊ गुण होतील आणि ते गटात अव्वल क्रमांकावर पोहोचतील, तर आफ्रिका आणि बांग्लादेश ८-८ गुणांसहित धावगतीनुसार दुसऱ्या व तिसर्या क्रमांकावर पोहोचतील. आणि वेस्ट इंडिजच्या ६ गुणांच्या तुलनेत आपल्या ७ गुणांच्या जोरावर इंग्लड सरस ठरेल आणि चौथा क्रमांक पटकावून बाद फेरीत प्रवेश करेल. वेस्ट इंडिज बाहेर!!!
२) भारत विंडिजविरूद्ध विजयी, बांग्लादेश आफ्रिकेविरूद्ध पराभूत-
पुन्हा एकदा भारताचे नऊ गुण होतील. मात्र आफ्रिकेने बांग्लादेशला नमवल्याने त्यांचे १० गुण होऊन ते अव्वल क्रमांक काय राखतील आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर स्थानापन्न होईल. इंग्लंडचे ७ गुण असल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर येतील. आता बांग्लादेश आणि वेस्ट इंडिजचे समसमान म्हणजेच ६ गुण होतील. मात्र आत्ताची धावगतीतीत मोठी तफावत पाहता विंडिज बांग्लादेशच्या पुढे निघून जाईल आणि बाद फेरीसाठी पात्र ठरेल. बांग्लादेश आऊट!!!
३) भारत विंडिजविरूद्ध पराभूत, बांग्लादेश आफ्रिकेविरूद्ध विजयी-
भारताविरूद्ध जिंकल्यास विंडिजचे ८ गुण होतील तर बांग्लादेशही आफ्रिकेवरील विजयासह ८ गुणांवर येऊन पोहोचेल. पराभवामुळे आफ्रिकाही ८ गुणांवरच अडकेल. परिणामत: हे तिन्ही संघ धावगतीप्रमाणे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहतील. तर भारत आणि इंग्लंड या दोघांचे ७-७ गुण होतील. सध्याच्या धवगतीप्रमाणे भारत(+०.७६८) इंग्लडपेक्षा (+०.०७२) खूप खूप पुढे आहे. त्यामुळे अगदीच दारूण आणि अविश्वसनीय पराभव भारताच्या पददी पडला नाही तर ते सरस धवगतीच्या जोरीवर इंग्लंडला मागे टाकतील आणि चौथ्या क्रमांकावर झेप घेऊन बाद फेरी गाठतील. इंग्लंड स्पर्धेबाहेर!!!
(फक्त याच शक्यतेत भारताला थोडासा धोका संभावतो.. कारण इकडे मामला रनरेट वर येणार आहे. याक्षणी भारताचा रनरेट इंग्लंडपेक्षा खूप सरस आहे. मात्र वेस्ट इडिजविरूद्ध भारताचा अगदी दारूण पराभव झाल्यास त्यांचा रनरेट खाली घसरू शकतो. आणि या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.)
( अगदी खोलात जायचे म्हटल्यास धावगतींच्या नियमांप्रमाणे भारत हा सामना हरताना त्यांच्या आणि विंडीजच्या धावगतीत ३.४ पेक्षा जास्त अंतर असून नये. म्हणजे भारतच इंग्लंडपेक्षा सरस ठरेल. उदाहरणार्थ विंडिजने प्रथम फलंदाजी करताना ६ च्या धावगतीने ३०० धावा केल्या. तर भाराताला (५० षटाकंच्या हिशेबाने) २.६ च्या गतीने, म्हणजेच सरळ सांगायचे झाल्यास १३० धावा तरी करता यायला हव्यात. मात्र विंडिजच्या ३०० च्या आसापस धावसंख्येला प्रत्युत्तर देताना १०० वगैरे करून आपला संघ ढेपाळला तर इंग्लंडसाठी ते वरदान ठरेल आणि भारताला मागे टाकून ते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.)
४) भारत विंडिजविरूद्ध पराभूत, बांग्लादेश आफ्रिकेविरूद्ध पराभूत-
आफ्रिका १० गुण पटकावून अव्वल स्थान पटकावेल. तर वेस्ट इंडिजचे ८ गुण होतील आणि ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. भारत आणि इंग्लंडचे सात गुण झाल्याने ते तिसऱ्या , चौथ्या क्रमांकावर राहतील. आणि परिणामत: बांग्लादेशला आपला गाशा गुंडाळावा लागेल. बांग्लादेश बाहेर !!!
(खास बाब- हाहाहा... एवढी क्लिष्ट मांडणी करताना मी एक गोष्ट मात्र बाजूला ठेवून चाललोय. ती टाय किंवा रद्द सामन्याची. आता या दोनपैकी एकजरी सामना टाय झाला तर आणखी वेगळी समीकरणं तयार होतील. त्यामुळे त्याच्या खोलात जात नाही. मात्र आपल्याला दिलासा म्हणजे कोणताही सामना टाय किंवा रद्द झाला, तर भारताला फायदाच होईल आणि ते कोणत्याही स्थितीत बाद फेरी गाठतील. (इकडेही खरंतर बांग्लादेशबरोबर नेट रनरेटची तुलना होऊ शकतो.पण नाही रे.. क्रिकेट हा कितीही अनिश्चिततेचा खेळ असला तरी काहीतरी लिमिट आहे ना... च्यायला असं करत बसलो तर झालंच मग...)
असो, बाकी काही होऊदे. माझा सिक्स्थ सेन्स सांगतोय की, भारत नक्कीच उपांत्यपूर्व फेरी गाठणार (आणि बहुतेक बांग्लादेशचा टाट-बाय बाय होणार). त्यामुळे खरंतर मी माझ्याच लेखाच्या पहिल्याच ओळीला चॅलेंज करतोय. आय होप हे सगळं वाचून तुमचं डोकं गरगरायला नाही लागलंय. काय करणार.. आफ्टर ऑल इट्स अ गेम ऑफ नंबर्स!!! इजन्ट इट ???