Wednesday, March 30, 2011

भारत वि. पाकिस्तान..मैदानावरील गरमागरम किस्से !!!


 भारत पाकिस्तानचा सामना म्हंटला की मैदानावरील गरमागरम वातावरण हे ठरलेलं असायचं. विशेषत: विश्वचषकातील लढतींमध्ये असे प्रसंग वारंवार घडलेले आहेत. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ एकूण चार वेळा एकमेकांविरोधात उभे ठाकले असून प्रत्येकवेळी भारताने पाकिस्तावर मात केली आहे. या सामन्यांमध्येही असेच काही अविस्मरमीय प्रसंग घडून गेले आहेत. या आठवणींना व्हिडियोंसहित दिलेला हा उजाळा..


      1992 (सिडनी) - इम्रान खानच्या लढवय्या पाकिस्तानी संघाने 1992 च्या विश्वचषकात न्यूझीलॅंड, इंग्लंड अशा भल्याभल्यांना पाणी पाजत विश्वचषकावर कब्जा केला होता. परंतु या प्रवासातही भारताकडून मात्र त्यांना मात खावी लागली होती. राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या गेलेल्या या बेन्सन अॅन्ड हेजेस विश्वचषकात साखळीत भारताची पाकिस्तानबरोबर गाठ पडली होती. यापूर्वी भारताला इंग्लंड तसेच ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. तर श्रीलंकेविरूद्धचा सामान पावसामुळे धुतला गेला होता. यावेळी अझरूद्दीन कप्तान असलेल्या भारतीय संघात कपिल देव, आताचे निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत, संजय मांजरेकर यांच्याबरोबरच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचाही समावेश होता. जडेजा, मनोज प्रभाकर, श्रीनाथ, किरण मोरे हे संघातील इतर सदस्य होते. पहिली फलंदाजी करताना भारताला सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या संथ खेळपट्टीवर 49 षटकांत 7 गडी गमावून फक्त 216 च धावा करण्यात यश आले. या धावा जमवण्यात सर्वात मोलाचा वाटा होता तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या छोट्या चणीच्या सचिन रमेश तेंडुलकरचा... सचिनने तब्बल 91 चेंडूंचा सामना करताना नाबाद 54 धावा केल्या होत्या. मात्र शेवटी याच 54 धावा निर्णायक ठरल्या. भारतातर्फे अजय जडेजा, अझरूद्दीन आणि कपिल देवनेही काही छोटेखानी पण उपयुक्त खेळी केल्या. तरी पाकिस्तानसमोर 216 चं आव्हान म्हणजे फारसं काही कठीण वाटत नव्हतं. परंतु भारताच्या श्रीनाथ आणि प्रभाकरने सुरूवातीलाच पाकिस्तानला धक्के देत इंझमाम आणि जाहिद फजलला बाद केलं. दुसरीकडे आमीर सोहेल मात्र खेळपट्टीवर टिकाव धरून होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जावेद मियॉंदादबरोबर त्याची चांगील भागीदारी जमली आणि पाकिस्तानचा डाव आकार घेऊ लागला होता. मात्र अखेर फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या सचिनने इथे आपल्या गोलंदाजीचीही कमाल दाखवली आणि सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या आमीर सोहेलला 63 धावांवर बाद केले. यानंतर पाकिस्तानी डावाची पडझड झाली आणि त्यांचा डाव 173 धावांतच संपुष्टात आला. फलंदाजीत 54 धावा आणि गोलंदाजीत 10 षटकं टाकून अवघ्या 37 धावा देत आमीर सोहेलचा बळी घेणाऱ्या सचिनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सचिनच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी हा सामना नेहमीच लक्षात रहिल. मात्र त्यापेक्षाही या सामन्याची एका खास कारणासाठी नेहमीच आठवण काढली जाते. जावेद मियॉंदाद हा नेहमीच भारताविरूद्धच्या सामन्यात काही गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असायचा. चेतन शर्माला शेवटच्या चेंडूवर षटकार खेजून पाकला विजय मिळवून देणाऱ्या जावेदची आणखी एक आठवण याच सामन्यातील आहे. जावेद मियॉंदाद आणि भारताचा यष्टिरक्षक किरण मोरे यांच्यातील प्रसिद्ध शाब्दिक चकमक आणि मियॉंदादच्या त्या माकडउड्या याच सामन्यातल्या. मियॉंदाद फलंदाजी करत असताना पाक फंलदाजांवर दडपण वाढवण्यासाठी भारतीय गोलंदाज, क्षेत्ररक्षक (खासकरून यष्टिरक्षक किरण मोरे) हे वारंवार फलंदाजाच्या पायाला चेंडू लागला रे लागला की पायचीतचे जोरदार अपील करायचे. तसेच पाकिस्तानचीच चिडखोर वृत्ती त्यांच्यावर उलटवण्यासाठी किरण मोरेचे मियॉंदादचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न चालले होते. यावर मियॉंदाद चांगलाच चिडला. सचिन गोलंदाजी करताना तो मध्येच थांबला आणि किरण मोरेला त्याने खडसावले. नंतर तर किरण मोरेला चिडवण्यासाठी त्याने माकडउड्या मारून किरण मोरेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मैदानावर प्रचंड गरमागरमी असताना या दोन खेळाडूंमधील ही चकमक चांगलीच रंगली आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय प्रसंग बनून गेली.



       1996 (बंगळुरू) - किरण मोरे आणि जावेद मियॉंदादमधील किश्शाने 1992 विश्वचषकाचा भारत पाकिस्तान सामना चांगलाच गाजला. यांनतर चार वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकात भारत पाकिस्तान आमनेसामने आले. आणि यावेळीही काहीशा अशाच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. किंबहुना 92 पेक्षा यावेळी मैदानावरील वातावरण चांगलेच तापले होते असं म्हणावं लागेल. कारण 92 ला सामना दूरदेशी ऑस्ट्रेलियात खेळला जात होता, तर यावेळी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी बंगळूरच्या स्टेडियम दणाणून सोडणाऱ्या आपल्याच पाठिराख्यांसमोर खेळत होते. तसेच हा सामना साखळीतील साधासुधा सामना नव्हता. तर उपउपांत्य लढत असल्याने येथे पराभव म्हणजे घरचा रस्ता पकडणं भाग होतं. प्रचंड गाजावाजा झालेल्या या सामन्यातील हिरो (वातावरण तापवण्यासाठी) ठरले आमीर सोहेल आणि वेंकटेश प्रसाद... सिद्धूच्या 91 धावांच्या जोरावर 287 धावांचा डोंगर भारताने उभारलेला होता. याचा पाठलाग करताना या सामन्यासाठी बदली कर्णधार असलेला आमीर सोहेल आणि भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या सईद अन्वर या दोघा पाक सलामीवीरांनीही धडाकेबाज सुरूवात केली होती. श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद या दोघांची धुलाई चाललेली. अखेर संघाच्या 84 धावा झाल्या असताना अन्वरची श्रीनाथने शिकार केली. परंतु आमीर सोहेल त्याच जोशात फटकेबाजी करत होता. वेंकटेश प्रसादच्या एका षटकात तर त्याने सलग दोन चेंडूंवर कव्हर्समधून दोन सणसणीत चौकार लगावले. आणि यामुळे त्याला चांगलाच चेव चढला. चौकार मारल्यानंतर मोठ्या माजात त्याने प्रसादला कव्हर्सच्या दिशेने बोट दाखवत याच ठिकाणी मी चौकार मारेन असं सुनावलं. प्रसादने मात्र आपलं डोकं शांत ठेवत पुढचा चेंडू अचूक टप्प्यावर टाकला आणि सोहेलचा त्रिफळा उडवला. अशारितीने सोहेलचा माज उतरला आणि नंतर पाकिस्तानने सामनाही गमावला. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांतील ही एक ठळक आठवण बनून गेली.



      1999 (मॅंचेस्टर)- 92 आणि 96 नंतर 99 साली मॅंचेस्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान हे विश्वचषकात तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले. मॅंचेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय तसेच पाकिस्तानी लोकांचे वास्तव्य असल्याने याठिकाणी सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सामन्याच्या दिवशी मॅंचेस्टर हे भारत किंवा पाकिस्तानच असल्यासारखे भासत होते. अशात अझरूद्दीनचा भारतीय संघ आणि अक्रमचा पाकिस्तानी संघ आपल्या देशाची इभ्रत वाचवण्यासाठी समोरासमोर आले. आणि पुन्हा एकदा 1996 प्रमाणेच वेंकटेश प्रसादने भेदक गोलंदाजी करत भारताला पाकिस्तानविरूद्ध विश्वचषक स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवून दिला. भारताच्या 227 या धावसंख्येला उत्तर देताना प्रसादच्या पाच विकेट्समुळे पाकिस्तानी टीम 180 मध्येच गारद झाली. यावेळी श्रीनाथनेही तीन बळी घेत प्रसादला मोलाची साथ दिली. भारतातर्फे सचिनने सलामीला येत 45, अझरूद्दीनने 59 तर राहुल द्रविडने 61 धावा केल्या होत्या.


2003 (सेंचुरीयन)- पुन्हा एकदा 2003 मध्ये सेंचुरीयनवर भारताची पाककिस्ताविरूद्ध गाठ पडली. या सामन्याचे वर्णन करायचे झाल्यास सबकुछ सचिन असंच म्हणावं लागेल. यावेळी 92 च्या विश्वचषकानंतर पुन्हा एकदा 11 वर्षांनी सचिनने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. सईद अन्वरने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत 101 धावांची शतकी खेळी केल्याने पाकिस्तानने भारतापुढे 274 धावांचे आव्हान ठेवले होते. येथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारत पाकिस्तानविरूद्ध धावांचा पाठलाग करणार होता. यापूर्वी तिन्ही खेपेस भारताने प्रथम फलंदाजी केली होती. आणि पाकिस्तानचा संघ दडपणाखाली येऊन कोसळला होता. मात्र आता परिस्थिती नेमकी उलट होती आणि पाकिस्तानी फलंदाजांनी आव्हानात्मक धावसंख्याही उभारली होती. त्यामुळे भारतावर दडपण आले होते. परंतु भारताची फलंदाजी चालू होताच अगदी पहिल्या षटकापासून सचिन-सेहवाग यांनी अशी काही फटकेबाजी चालू केली की पाकिस्तानी गोलंदाजच दबावाखाली आले. आग ओकणारा शोएब अख्तर, वकार युनूस अशा कोणालाच या दोघांनी जुमानले नाही आणि सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मग सेहवाग बाद झाल्यानंतरही सचिनने आपला धडाका कायम ठेवला. सचिनचं शतक मात्र अवघ्या दोन धावांनी हुकलं. पण त्याच्या 75 चेंडूंमधील 98 धावांच्या या तुफान खेळीने भारताला कधीच विजयाच्या दाराशी नेऊन उभे केलं होतं. त्यानंतर द्रविड आणि युवराजने नाबाद खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला भारतासमोर लोटांगण घ्यावं लागलं. यावेळी सुरूवातीच्या षटकांत सचिन-सेहवाग फलंदाजी करत असतानाचा त्यांचा तुफानी अंदाज निव्वळ दृष्ट लागण्यासारखा होता. अलीकडेच सेहवागने केलेल्या खुलाशानुसार शोएब अख्तर वारंवार त्याला बाउंसर टाकून हुसकावत होता. तेव्हा त्याने समोर तुझा बाप उभा आहे, त्याला बाउंसर टाक, तो सिक्स मारेल असं सुनावलेलं. यावेळी शोएबने सचिनला तेजतर्रार बाउंसर टाकताच सचिनने एक शानदार हुकचा फटका लगावर चेंडू सीमारेषेपार भिरकावून दिला होता. हा सामना पाहिलेला कोणीही भारतीय हा षटकार आपल्या उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही.


No comments:

Post a Comment